Thursday, January 5, 2012

राज व्यावहारिक,बेळगाव काही प्रश्न,,

मी खरं तर मनसे आणि राज साहेबांचा फार मोठा चाहता होतो,
पण बेळगाव प्रश्नाबाबत पर्वा ते जे काही बोलले, त्याने माझी घोर निराशा केली आहे.
कधी, कुठे, काय बोलायचं? आणि कुठे न बोलता गप्प राहायचं!
हे "राज व्यवहारिक "यांना खरं तर खूप छान जमत होतं.
त्यामुळेच तर मी त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पहात होतो.
पण अलिकडच्या काळातील त्यांची विधानं पाहता, त्यांची लय आता हरपू लागली आहे, अशी शंका येते.
डोक ठिकाणावर आहे कि नाही?अशी शंका येते.
मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवरील Political View मधून मनसेला काढून टाकलं आहे.
आता "फक्त मराठी", मग जो कोणता पक्ष या विचाराला साथ देईल, त्याला माझी साथ असेल.
जर कोणीच साथ दिली नाही, तरी मी माझ्या विचारसरणीवर ठाम असेन.
ज्या व्यक्तिवर मराठी लोकांचा इतका जीवापाड विश्वास, ती व्यक्ति असं बोलूच कशी शकते?
पण मला याचं आश्चर्य वाटू लागलय?
ते उद्या बेळगाव कर्नाटकातच राहिलेला बरा म्हणतील, त्याचं काय!?
"राज व्यवहारिक"बेळगावबाबत काहीच कसं बोलत नाहीत,
याचं मला इतके दिवस आश्चर्य वाटत होतं! आणि आता वाटतं, ते का बोलले!?
त्यापेक्षा ते त्या प्रश्नावर काहीच बोलले नसते, तर खूप बरं झालं असतं.
त्यांनी जी विधानं केली त्यामध्ये वैचारीकतेपेक्षा वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते.
"राजव्यावहारिक" यांच्या विधानांच्या अनुषंगाने मला त्यांना काही बोलायचं आहे,
त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत :

*कर्नाटकचे सरकार बेळगावासीयांना सगळ्या सुखी-सोयी देणार असेल,
तर बेळगाव कर्नाटकातच राहू द्या. - राज व्यावहारिक.*
(मग उद्या पाकीस्तान काश्मिरच्या जनतेला सुखात ठेवण्याची हमी देईल,
देऊन टाकूयात का काश्मिर पाकिस्तानला!? नाहीतरी बेळगावपेक्षा काश्मिरप्रश्नाने कितीतरी अधिक लोकं रोज मरत आहेत,
काश्मिर पाकिस्तानला दिला की प्रश्नच सुटला!)

*५५ वर्ष झाली तरी प्रश्न सुटत नाहीत, मग आपण प्रॅक्टिकल विचार करुन तो प्रदेश कर्नाटकातच राहू द्यावा -राज व्यावहारिक*
(५५ वर्षं प्रयत्न करुन भारताने स्वातंत्र्याची आस सोडून प्रक्टिकल विचार करुन ब्रिटिशांच्या राजवटीत,
पारतंत्र्यात सुख-समाधान मानून रहायला हवे होते का!? भारताला स्वातंत्र्य मिळायलाही १५० वर्ष लागली.)

*नाहीतरी महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत, त्यापेक्षा बेळगाव कर्नाटकातच राहू द्या! - राज व्यावहारिक*
(प्रश्न कुठे नसतात हो!? भारतातही प्रश्न आहेत, मग देऊन टाका काश्मिर पाकिस्तानला.
नाहीतरी कर्नाटक म्हणजे काही कॅलिफोर्निया नाहीये, की तिथे सुखात रहायला मिळतं!
अब्जावधी रुपयांचा खाण घोटाळा तिथेच झालेला ना!)

*तिथल्या जनतेने इथे येऊन निराश होण्यापेक्षा तिथेच मिळूनमिसळून रहावं -राज व्यावहारिक*
(हे ठरवायला तिथली जनता समर्थ आहे. "ही ‘श्री’ची ईच्छा!"
या आपल्या आत्मचरित्रात मूळचे बेळगावचे असलेले प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटलं आहे,
‘मी तर बेळगावचा प्रश्न माझ्यापुरता कधीच सोडवला आहे,
आणि तो महाराष्ट्राचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे.’ ज्या अर्थी बेळगावचं आंदोलन गेली ५५ वर्षं धगधगत आहे,
त्यावरून तिथल्या जनतेची ईच्छा काय आहे? ते स्पष्ट होतं.
"राज व्यवहारिक यांचं वक्तव्य बेळगावमधील स्वातंत्रप्रेमी मराठी जनतेचा आणि सबंध महाराष्ट्राचा घोर अपमान करणारं आहे.)

*बेळगावमधील मराठी लोकांना कन्नड यायलाच हवं - राज व्यावहारिक*
(अहो! संबंध काय आहे!? जो प्रदेश मुळात कर्नाटकचा नाहीयेच, तो मराठीवर अन्याय करुन,
आकसाने महाजन आयोगाने त्यांना दिला, आणि परत त्यांचीच भाषा शिकायची?
का तर म्हणे तो आता त्यांचा प्रदेश आहे!? बेळगाव हा खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचा आहे,
तो कर्नाटकात घातला गेला म्हणून केवळ तिथल्या मराठी लोकांनी कन्नड शिकावं!
याला काहीच अर्थ नाही. हा कसला विचार? यामागे काही तर्क सापडत नाही!)

इथे जर कोणाला वाटत असेल, बेळगाव आणि आपला संबंध काय ???
तर मी म्हणेन, अहो! बेळगावशी आपला जरा तरी संबंध आहे,,
पण काश्मिरशी आपला लांब लांब पर्यंत तरी काही संबंध काय??
तिथे कायद्याने आपण एक फुट
जमिनही विकत घेऊ शकत नाही.
मग का लढत आहोत आपण काश्मिरसाठी?आहे उत्तर!?
मग सांगा बेळगावसाठी का लढायचं नाही?
आपण खरं तर बेळगावसाठी जास्त लढलं पाहिजे.
शेवटी शेवटपर्यंत लढणं महत्त्वाचं आहे, हरणं किंवा जिंकणं नंतर आलं.
उगाच शिवसेनाला विरोध करायचा म्हणून वाटेल ते काहीही बडबडण्याला काय अर्थ आहे?

मला अशी शंका येते की, राज व्यावहारिक यांचा इगो काही कारणाने दुखावला गेला असावा.
कारण शिवसेना, बेळगाव, महाराष्ट्र एकिकरण समिती, असं काहीसं दृष्य नेहमी पाहायला मिळतं.
आणि त्यामुळेच त्यांनी अशी महाराष्ट्र विरोधी भुमिका घेतली.
पण ज्याला खरंच मराठीविषयी आत्मियता आहे, तो काही झालं तरी असं बोलेल का?
राज व्यावहारिक यांच्या वक्तव्यामुळे माझ्यासारखे त्यांचे बरेच चाहते आता नक्कीच कमी झाले असणार.
फेसबुकवरील प्रतिक्रियांमधून देखील हेच समोर येत आहे.
राज साहेब! इतके दिवस जे कमवलंत, ते असं का घालवलंत?

पण ठाणेदार यांच्याप्रमाणे मी देखील बेळगाव प्रश्न माझ्यापुरता सोडवला आहे.
बेळगाव, निपाणी, कारवार, बिदरचा काही भाग, डांग हा सर्व महाराष्ट्राचाच प्रदेश आहे.
मी माझ्या परीने नेहमीच संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनाला पाठिंबा देत राहिन.
भविष्यात येणार्‍या पुढील पिढीला याबाबत सांगत राहिन.
आजचा हा लेख देखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
या लेखाने काय होणार? ..काही होईल किंवा नाही होणार..
उद्या कदाचीत आपण हरलो.. तरी माझ्या मनात तेंव्हा मी जिंकलो असेन, कारण शेवटी मी मनापासून प्रयत्न केला.
विजय येईल किंवा पराभव होईल,
पण मी राज व्यावहारिक
यांनी सांगितलेला प्रक्टिकल विचार केला नाही,
याचा माझ्या मनात आनंद असेल,,,
सीमा वासियांच्या अपेक्षांचा अपमान मी नाही केला याचा अभिमान असेल...

No comments:

Post a Comment